मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले . नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार की नाही याबाबत उत्सुकता होती.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता. मात्र राणेंनी आज नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केले . यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून अशीच प्रगती कर असे म्हटलं असते , असे राणे म्हणाले. शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचं सरकार येईल”, असा विश्वास यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला.हे जनतेचं प्रेम आहे. मला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पंतप्रधान मोदींसाहेबांमुळे हे पद मिळालं. अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे आभार. मंत्रिपद मिळाल्याच्या दीड महिन्यांनी मी महाराष्ट्रात आलो आहे. भाजपकडून आज जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला नतमस्तक झालो. माझ्या खात्याकडून जास्त रोजगार कसे तयार होतील, नोकऱ्या उपलब्ध करणे , दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, असे राणे म्हणाले.