येस न्युज मराठी नेटवर्क : मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात एसटी बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चौघेजण जळगावच्या अमळनेरचे रहिवाशी होते. अपघातामध्ये बसचे चालक चंद्रकांत एकनाथ पाटील आणि वाहक प्रकाश चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच निंबादी आनंद पाटील आणि कमलाबाई पाटील यांचाही मृत्यू झाला असून चौघ जण अमळनेरमधील आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी अरवा मूर्तजा बोरा या अकोल्यातील आहेत. या अपघातामुळे अमळनेर तालुक्यावर एकच शोककळा पसरली आहे. या एसटी बसमधील २५ ते ३० जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे.
एसटी अपघातातील आठ जणांची ओळख पटली
1) चालक – चंद्रकांत एकनाथ पाटील (वय- ४५, अमळनेर)
2) वाहक – प्रकाश चौधरी (वय- ४०, अमळनेर)
3) निंबाजी आनंदा पाटील (वय- ६०, अमळनेर)
4) कमलाबाई निंबाजी पाटील (वय ५५, अमळनेर)
5) चेतन गोपाल जांगिड (जयपुर, राजस्थान)
6) जगन्नाथ हेमराज जोशी (वय ७०, उदयपुर, राजस्थान)
7) सैफुद्दीन अब्बास नूरानी (इंदूर)
8) अरवा मूर्तजा बोरा (वय २७, मूर्तिजापूर, अकोला)
याशिवाय अद्याप पाच मृतदेहांची ओळख पटायची बाकी आहे.अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून, अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येणार असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमींवर उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहेत. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. एसटी महामंडळाकडून दुपारी दीड वाजता सदर माहिती देण्यात आली आहे.