चिपळूण: काल रात्री ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस झाल्याने चिपळूण शहरासह खेर्डी परिसरात महापूर आला आहे. २६ जुलै २००५ला आलेल्या महापुरापेक्षा हा भयंकर महापूर आहे. जवळपास पाच हजार लोक या पुरात अडकली असल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेकजण घराच्या माळ्यावर, छपरावर अडकून पडले आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम पुण्याहून निघाली आहे. कोस्ट गार्डच्या बोटी या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. कोस्टल गार्ड हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्याच्या तयारीत आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम, आमदार भास्करशेठ जाधव यंत्रणेला सूचना करीत आहेत. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सहा फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत .चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.
रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्ठी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर याबरोबरच खेंड परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत.
याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेकजण घरात अडकले आहेत. पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले.शहरालगतच्या खेर्डीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आहेत. याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत तीव्र गतीने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
