मुंबई : पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर देशाच्या आगामी राजकारणाची वाटचाल अवलंबून आहे. यानंतर देशात विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या स्थापन होतील, असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वर्तविले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण ममता बॅनर्जी ही एकटी वाघीण त्यांना पुरुन उरत आहेत. ही लढाई अटीतटीची आहे. पण या लढाईत ममता बॅनर्जी बाजी मारतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. महाभारताचे युद्ध 21 दिवसांत संपले पण कोरोनाचा 18 दिवसांत अंत होईल, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. पण आज वर्ष उलटून गेल्यानंतरही कोरोना कायम आहे. त्यामुळे मोदी सरकारला कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकता आलेले नाही. कोरोनाला हरवता न आलेले मोदी सरकार आता पश्चिम बंगामध्ये ममतांच्या पराभवासाठी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये नवं महाभारत घडत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.