पंढरपूर: बारामतीमधील निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणाऱ्यांची प्रसारमाध्यमांकडून इतकी नोंद का घेतली जाते, अशी खोचक टिप्पणी करणाऱ्या अजित पवार यांना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार पडले तेव्हा तुमची लायकी नव्हती का, असा बोचरा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला.
ते शनिवारी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या टीकेची सव्याज परतफेड केली. 2019 मध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा 2,15,913 मतांनी दणदणीत पराभव केला होता. हाच मुद्दा पकडत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार काय म्हणाले होते ?
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत अजित पवार यांना शुक्रवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत विचारणा करण्यात आली. तेव्हा अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची इतकी दखल घेण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही, उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय, असे अजित पवार यांनी म्हटले होते.