माजी आमदार आडम यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
सोलापूर : राज्यातील चार लाख महिला विडी कामगारांना संरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडावी, या मागणीसाठी माजी आमदार नरसय्या आडम यांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर निदर्शने केली. या हल्लाबोल आंदोलनात सिटू कामगार संघटनेच्या हजारो विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या. ‘आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा’ तसेच ‘ विडी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. मुंबई उच्च न्यायालयात विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी जनहित याचिका दाखल झाली असून आत्तापर्यंत पाच वेळा सुनावणी झाली आहे. २५ जून रोजी मुख्य न्यायाधीश या याचिकेवर अंतिम आदेश देणार आहेत. जनहित याचिकेच्या बाजूने निकाल झाला तर राज्यातील साडेतीन लाख विडी कामगार क्षणार्धात भिकेला लागतील, असे निवेदन आडम मास्तर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून कामगारांची बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे , अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.