येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खोळंबण्याचे चिन्ह आहेत. या वयोगटाचे राज्यात १ मेपासून लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर ते बोलत होते.
गेल्याकाही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा भासत आहे. आजही मुंबई- पुण्यासह अनेक लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्यानं अनेक नागरिकांना माघारी परतावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी १ मेपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. मात्र, लसीच्या कमतरतेमुळं १मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, ४५ वर्षांच्या वयोगटातील राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम सुरुच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘लस आज आपल्याला लगेच उपलब्ध होत नाहीय. त्यामुळं १ मेपासून लगेचच लसीकरण सुरु होणार नाही, १८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. लसीच्या कमतरतेमुळं १ मेपासून लसीकरण शक्य नाही,’ असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.