अमेरिकेत अवैध नागरिकांची धरपकड सुरु करण्यात आल्यानंतर यामध्ये भारतीय सुद्धा पकडण्यात आले. अमेरिकन लष्करी विमानाने भारतीयांची पहिली 104 जणांची तुकडी भारतात परतली. मात्र, त्यांच्या हातापायात साखळदंड पाहून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी ते अवैध प्रवासी असले, तरी त्यांना त्या पद्धतीने वागवण्याची ही पद्धत नसल्याचे सुद्धा दाखवून दिले. मात्र, अमेरिकन कोअर व्होट बँकेला खूश करण्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतही कसर सोडलेली नाही. भारताची सुद्धा मवाळ भूमिका चर्चेचा विषय ठरला असून अमेरिकेला शरण कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. अणुकरार करताना स्वर्गीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतलेली कणखर भूमिका तसेच देवयानी खोब्रागडे प्रकरणात दिलेली जशास तसेची वागणूक याची सुद्धा अनेकांनी आठवण करून दिली.
कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेतली जाईल
आता दुसऱ्या अमेरिकेने 487 अवैध स्थलांतरितांना भारतात पाठवण्यासाठी यादी तयार केली आहे. त्यापैकी सुमारे 298 जणांची माहिती देण्यात आली आहे. 4 फेब्रुवारी रोजी 104 अवैध अनिवासी भारतीयांना भारतात पाठवण्यात आले होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, भारतीयांना पाठवताना कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. असा कोणताही मुद्दा आमच्या निदर्शनास आला तर आम्ही तो अमेरिकेसमोर मांडू. मिसरी म्हणाले की, भारतीयांना भारतात पाठवताना त्यांच्याशी गैरवर्तणूक होत असल्याचा मुद्दा त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. निरपराध लोकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवून त्यांची दिशाभूल करणे हा कर्करोगासारखा आजार असल्याचे त्यांनी सांगितले. असे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.