येस न्युज नेटवर्क : राज्यात येत्या काही महिन्यात विधान परिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. विधान परिषदेच्या या 10 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या जागांमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आतापासूनच लाँबिंगला सुरुवात केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. तर, महापालिका निवडणुकांबाबतही अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे अनेकांनी विधान परिषदेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अवघ्या काही जागांसाठी डझनभर नेते इच्छुक आहेत.
विधान परिषदेच्या आमदार निवडणुकीचे गणित काय?
येत्या जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची एक जागा रिक्त होत आहे. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत निवडणुक होऊ शकते. विधानपरिषदेवर सध्या भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 1 सदस्य आहेत.
या आमदारांची मुदत संपली
विधान परिषदेचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या किती आमदारांना पुन्हा संधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, संजय दौंड आदी सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे.