टोकियो : टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिला पदक मिळून दिले. या प्रकारात चिनी वेटलिफ्टर हौ झीहूने पहिले स्थान मिळवले, तर इंडोनेशियाच्या विंडी असाहने कास्यपदक जिंकले.कांस्यपदकाची कमाई केल्यानंतर मीराबाई चानूने आपली प्रतिक्रिया दिली. ”पदक जिंकल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. संपूर्ण देश माझ्याकडे पाहत होता आणि त्यांच्या अपेक्षा होत्या. मी जराशी नर्व्हस झाले, पण मी माझा सर्वोत्तम देण्याचा निर्धार केला. यासाठी मी खूप कष्ट केले”, असे तिने सांगितले.
सुवर्णपदाकाचा विचार केला होता का, या प्रश्नावर मीराबाई म्हणाली, ”मी सुवर्णपदक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण सुवर्ण जिंकू शकले नाही, परंतु मी खरोखर प्रयत्न केला. जेव्हा मी दुसऱ्यांदा वजन उचलले, तेव्हा मला समजले, की मी माझ्याबरोबर पदकही घेऊन येत आहे.”
मीराबाईचा संघर्ष
कनिष्ठ गटातील मीराच्या व्यावसायिक कारकीर्दीला जेव्हा प्रारंभ झाला, तेव्हा तिच्यापुढे अनंत अडचणी होत्या. तिचे प्रशिक्षक तिला आहाराचा तक्ता द्यायचे. त्यात चिकन आणि दूध हे महत्त्वाचे घटक असायचे. मात्र त्या तक्त्याला न्याय देऊ शकणारी आर्थिक पुंजी तिच्या कुटुंबीयांकडे नव्हती; परंतु तिने हिमतीने अशा अनेक अडचणींवर मात केली. २०१३ मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला सर्वोत्तम लिफ्टर हा मान मिळाला. २०११च्या आंतरराष्ट्रीय युवा अिजक्यपद स्पर्धेत आणि कनिष्ठ गटाच्या दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या याच कामगिरीमुळे ती भारताचे भविष्य असल्याची ग्वाही क्रीडा क्षेत्राला मिळाली होती.