येस न्युज मराठी नेटवर्क । भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजे 10 मार्च 1897 साली झाला. प्लेग पिडितांसाठी काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.

सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांच्या मदतीने पुण्यात पहिल्या मुलीच्या शाळेला सुरुवात केली. त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेचं काम केलं. त्या अर्थी त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील जातीयवाद आणि अन्यायी रुढी परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. अत्याचार, बालविवाह यांच्याविरोधात भूमिका घेतली आणि समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.