मुंबई : आठवण ठेवा. सरकार नाय बरखास्त केलं तर नाव बदलून ठेवा असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत दिला होता. या आधीही भाजप नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याची विधानं केली होती. या सर्व विधानांचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. राष्ट्रपती राजवटीची चर्चा कोण करतय माहीत नाही. अशी चर्चा करणारे मूर्ख आहेत. राज्यात पूर्ण बहुमताचं सरकार आहे. 170 आमदारांचा पाठिंबा आहे. अशा किरकोळ गोष्टींवर राष्ट्रपती राजवट लावण्याची कुणी भाषा करत असेल तर त्यांनी देशाची घटना वाचून घ्यावी, असा टोला राऊतांनी लगावला आहे.