येस न्युज मराठी नेटवर्क ; दिलीप कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण नाशिकमध्ये पार पडलं. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवले आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘मुगल-ए-आझम’ , ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील. ‘मुगल-ए-आझम’ या सिनेमातील सलीम हा तर त्यांनी अजरामर केला. त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच तोड नाही.
सिनेसृष्टीतील सेकंड इनिंगमध्येही दिलीप कुमार यांच्या सिनेमांची घोडदौड सुरुच होती. ‘क्रांती’, ‘विधाता’, ‘शक्ती’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ असे एकाहून एक सरस सिनेमा दिलीप कुमार यांनी साकारले. त्यातील वेगळेपणा आपल्या अभिनयातून जपला. ‘मशाल’मध्ये तर त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती. शक्ती या सिनेमात दोन अभिनय सम्राटांची जुगलबंदी होती. एक होते दिलीप कुमार आणि दुसरे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची आणि एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका दिलीप कुमार यांनी साकारली. हा सिनेमाही चांगलाच चर्चिला गेला होता. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
दिलीप कुमार यांचं वैवाहिक आयुष्य
अभिनय सम्राटाच्या व्यक्तीगत आयुष्यातही काही समस्या होत्या. तराना सिनेमाचे शूटींग करताना दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सात वर्षे ते एकमेकांसोबत होते. मात्र ‘नया दौर’ सिनेमच्या वेळी काही कारणांमुळे हे नाते संपुष्टात आले. त्यानंतर वयाने २२ वर्षांनी लहान असणाऱ्या सायरा बानो यांच्याशी १९६६ मध्ये विवाह करून दिलीप कुमार यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या सॉलिसिटर आस्मा साहिबा यांच्याशीही १९८१ मध्ये लग्न केले होते. मात्र त्यांचा दुसरा विवाह फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षातच हे दोघेही विभक्त झाले. मात्र सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ केला आणि त्यांना साथ दिली.
दिलीप कुमार यांना मिळालेले पुरस्कार
दिलीप कुमार यांना मिळालेले पुरस्कार हादेखील चर्चेचा विषय आहे. कारण त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुकात झाली आहे. ८ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. फिल्मफेअर पुरस्कारात १९ वेळा नामांकने मिळवणारेही ते एकमेव अभिनेते होते. .