मुंबई : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना धान्य वितरणाचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे महिला बचत गट आणि संस्थांना आर्थिक उभारी मिळणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असल्यामुळे शाळा स्तरावर शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देता येत नाही. अशा परिस्थितित आहार खर्च मर्यादेमध्ये कोरडा शिधा वाटप करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत.
राज्यामध्ये नागरी भागातील शाळांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये तयार आहाराचा पुरवठा महिला बचत गट व संस्थांमार्फत करण्यात येतो. शाळा बंद असल्यामुळे नागरी भागातील विद्यार्थ्यांना कोरडा शिधा सदर बचत गट संस्थांमार्फत पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 17 डिसेंबरच्या परिपत्रकात घेतला आहे.