शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
मुंबई : ”मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकट येत आहेत. अतिवृष्टीचे संकट आले . हजारो घरे पडली. हजारो घरांमध्ये पाणी शिरले . पण एक गोष्ट चांगली आहे, की या संकटांवर देखील मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली.” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज जाहीर कौतुक केले.
बीबीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, ”एका बाजूने या पूरग्रस्त भागातील घरांची बांधणी करणे हे आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूने समस्त कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठे पाऊल पडत आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग आहे. हा सगळा परिसर याचा इतिहास नुकताच एका ग्रंथाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला गेला आहे. बीडीडी चाळ व या सर्व परिसरात एक दृष्टीने देशाचाच इतिहास घडला. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते . ज्यांनी या देशातील प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला. त्यांचे देखील आज या ठिकाणी स्मरण करतो. परिवर्तनाच्या चळवळीत अत्यंत महत्वाचे मार्गदर्शनाचे काम करणारे, प्रबोधनकार ठाकरे यांचे वास्तव्य या परिसरात एकेकाळी होते , अण्णाभाऊ साठेंचे देखील होते . महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीत ज्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचाही संचार या भागात होता आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संबंध महाराष्ट्र जागृत करण्यासंबंधी कार्य करणारे आचार्य अत्रे यांचं देखील वास्तव्य या परिसरात होते . ”