मुंबई : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे. या मोसमाला एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते. तसेच साखळी सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईलगत असलेल्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. मात्र अजूनही बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
टीओआयनुसार, आयपीएलच्या 14 व्या मोसमातील साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईनजीकच्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात बरेच स्टेडियम असल्याने बीसीसीआयने मुंबईत साखळी सामने खेळवण्यास पसंती दिली आहे. मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत. तसेच अहमदाबादमधील मोटेरा आणि सरदार पटेल स्टेडियममध्ये बाद फेरीतील सामन्यांचं आयोजन केलं जाणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.