येस न्युज मराठी नेटवर्क : देशातील गंभीर कोरोनास्थितीची स्वत:हून दखल घेतलेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्यात काय स्थिती आहे यावर उच्च न्यायालय लक्ष देतील असं स्पष्ट करत देश इतक्या मोठ्या संकटातून जात असताना आपण फक्त मूक प्रेक्षक म्हणून बसू शकत नाही असं म्हटलं आहे. राज्यांमध्ये समन्वय साधण्याची आमची भूमिका असेल असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नव्याने सुनावणी सुरु केली. यावेळी खंडपीठाने उच्च न्यायालयांमधील सुनावणी सुरु राहील स्पष्ट करताना आपण आम्ही पूरक भूमिका निभावत ज्या मुद्द्यांवर ते लक्ष देऊ शकत नाहीत त्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न असेल असं स्पष्ट केलं. “सर्वोच्च न्यायालयाने समन्वयाची भूमिका निभावणं गरजेचं आहे. इतकं मोठं राष्ट्रीय संकट असताना आम्ही मूक प्रेक्षक म्हणून शांत बसू शकत नाही,” असं खंडपीठाने सांगितलं. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही मध्यस्थी करु शकतो सांगत सर्वोच्च न्यायालयाने लोकांचे जीव वाचवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.