२१ मे ते १ जून : किराणा, भाजीपालाही बंद; फक्त घरपोच सेवाच सुरू
सोलापूर । ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवार २१ मे ते १ जून या कालावधीत ग्रामीण भागातील किराणा साहित्य, भाजीपाला, दारू दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत. कृषी क्षेत्राशी निगडित असलेली कृषी दुकाने व इतर सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. किराणा साहित्य, भाजीपाला, फळांची सकाळी ७ ते ११ या कालावधीत फक्त घरपोच सेवा देता येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. ग्रामीण भागातील अंडी, मांस, मटण विक्री दुकाने, हॉटेल उपाहारगृह लॉज रिसॉर्ट मॉल मार्केट बंद राहील.
दारू विक्रीची बिअर शॉपी, देशी व विदेशी दुकाने बंद राहतील. सर्व बाजार समित्या आठवडे बाजार ठोक व किरकोळ विक्रेत्यांची दुकानेही बंद राहतील. रस्त्याच्या कडेला असणारे फळविक्रेते, फेरीवाले त्याचबरोबर प्रार्थना स्थळे, मंदिरे, चित्रपटगृहे, नाट्यगृह, सभागृह, शाळा, महाविद्यालये बंद राहतील. केशकर्तनालय, ब्यूटी पार्लर, स्पा या सर्व स्थापना व दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.