एकेकाळी उद्योग नगरी तसेच कामगारांचे शहर म्हणून सोलापूरचा नावलौकिक होता. इथली वाडा संस्कृती आता फ्लॅट संस्कृतीमध्ये कन्व्हर्ट झाली आहे. सहाव्या क्रमांकाचे मोठे असलेले सोलापूर शहर आता राज्यात नवव्या क्रमांकावर गेले आहे. आयटी उद्योग नाहीत तसेच मोठे उद्योग नसल्यामुळे स्थलांतर वाढत आहे. राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीची संख्या सुमारे 88 हजार आहे. सर्वाधिक शासकीय कर्मचारी असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये सोलापूरचा अव्वल नंबर आहे. या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन पोटी दरवर्षी सुमारे साडेचार हजार कोटी रुपये खर्च होतात. कोषागार कार्यालयाच्या माहितीनुसार जिल्ह्यात 38 हजार पेन्शन धारक असून त्यासाठी दरमहा 80 कोटी रुपये पेन्शनला लागतात. त्यामुळे उद्योग नगरी असलेली..त्यानंतर कामगार नगरी बनलेली सोलापूर सिटी आता पेन्शनर सिटी बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रस्तावित आयटी पार्क करणे , विमानसेवेचे जाळे विस्तारणे आणि उद्योग वाढविण्यावर इथल्या प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी भर देणे गरजेचे आहे.

