सोलापूर शहरात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या दोन उड्डाणपूलांची मोठी शोकांतिका बनली आहे. यासाठी 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून महापालिकेने वेळेत भूसंपादन न केल्यामुळे आजवर एन एच ए आय ने तीन वेळा टेंडर काढून देखील काही उपयोग झाला नाही. या दोन प्रस्तावित उड्डाणपूलांसाठी किमान 100 पेक्षा जास्त बैठका झाल्या आहेत. 2014 पासून सोलापूरकर या उड्डाणपुलाचा खेळ खंडोबा पाहत आहेत. विशेष म्हणजे भूसंपादनापोटी महापालिकेने 60 ते 70 कोटी रुपये देऊन त्या जागा अद्याप जागामालकांच्याच ताब्यात आहेत.दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठक घेतल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी देखील बैठक घेतली. आता पुन्हा चार एप्रिल रोजी बैठक होणार आहे. बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे सोलापूरचे प्रश्न लवकर मार्गी लागत नाही. 2014 सालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे उड्डाणपूल मंजूर केले आहेत याला बारा वर्ष उलटली. त्यामुळे हे उड्डाणपूल होणार की नुसत्या चर्चा होणार याबाबत सोलापूरकरांच्या मनात शंका आहे.

