मुंबई,दि. – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याचे नियोजन हे येत्या तीस-चाळीस वर्षातील वाढीव लोकसंख्या आणि बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकाळाचा विचार करुन व्यापक स्वरुपात करण्याच्या सूचना ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी येथे दिल्या.
मंत्रालयात आयोजित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखडा व जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधितांना सूचित केले. बैठकीस आमदार समाधान औताडे,सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच संबंधित यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार प्रणिती शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होत्या.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराचा विकास करताना पुढील तीस चाळीस वर्षांत शहराचा होणारा विस्तार, लोकसंख्या वाढ,वाहनांची वाढती संख्या, मंदिरास भेट देणा-या भाविकांची, देशापरदेशातून येणा-या पर्यटकांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नियोजन करावे. पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची लांबी रुंदी, वारी काळात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन, मंदिर परिसर विकासाचे नियोजन , कामाचा दर्जा या सर्व बाबी या येत्या भविष्याचा विचार करुन दर्जदार व व्यापक स्वरुपात कराव्यात.
मंदिर विकासाबाबत सविस्तर आढावा घेऊन ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधितांना सूचना दिल्या.
