महाराष्ट्र केसरी कोण होणार? हे स्पर्धेच्या आधीचं ठरलं जातं, असा गंभीर आरोप शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचे वस्ताद अर्जुनवीर काका पवार यांनी केला. शिवराज राक्षे आणि महेंद्र यांच्यावर 3 वर्षे कुस्ती खेळण्याची बंदी घातल्यानंतर पवारांनी पंचाला जन्मठेप द्या, अशी मागणी केली आहे. तसेच मी शिवराजच्या चुकीचं मी समर्थन करणार नाही असंही काका पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा गदारोळ माजला. त्यामुळं या कुस्तीच्या आखाड्यात नेमकं राजकारण कोणी आणलं? यात राजकीय हस्तक्षेप वाढलाय का? यामुळं फक्त पैलवान संपवतोय की कुस्ती? पुढची तीन वर्षे शिवराज आणि महेंद्र कुस्ती खेळणार का? या प्रश्नांवर काका पवारांनी सडेतोड उत्तरं दिली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी ही माहिती दिली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.