मुंबई: राज्यात सुरू असलेल्या ब्रेक द चेन या अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक १४ जूनपर्यंत या योजनेंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय दि. १४ मे रोजीच निर्गमित केला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन संख्येतही दीडपट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला आहे.
राज्यातील करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजने अंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. १५ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या योजनेचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.