येस न्युज मराठी नेटवर्क । दिल्लीच्या वेशीवर महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्षांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारत बंद, राष्ट्रपती भेट, दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेले पत्र अशा अनेक गोष्टी विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. पण ‘मरतुकड्या’ विरोधकांमुळे सत्ताधारी मोदी सरकारवर म्हणावा तसा दबाव येत नसल्याची भूमिका सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली, असं म्हणत अपयशाचं खापर शिवसेनेने काँग्रेसच्या माथी फोडलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आजच्या सामनाच्या अग्रलेखात देशातील विरोधी पक्षावर टीका करण्यात आली आहे. सध्याचा घडीला विरोधी पक्षातील नेते कमकुवत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर विखुरलेले आहेत. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र, देशभरात केवळ राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे नेते शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. केवळ शरद पवार सक्रिय आहेत आणि बाकीचे नेते निष्क्रिय झाले असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?”, असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.