मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? हा सवाल आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारलं आहे. काल वरळीत झालेल्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांवर जोरदार निशाणा साधत सडकून टीका केलीय.
ते म्हणाले, हे गद्दार सरकार फक्त महाराष्ट्रासाठी धोक्याचे नाही तर साऱ्या देशासाठी धोक्याचे असल्याचे सांगत या गद्दारांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यांना गद्दार आणि खोक्यांचं सरकार म्हंटलं तरी ते नाकारत नसल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता सगळीकडे घोटाळा करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील रस्ता घोटाळ्यातही कोट्यवधींचे घोटाळे केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा टेंडर त्यांना काढावी लागत आहेत. हे सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांचं झालंय, आपल्य जवळच्यांना कंत्राट देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
आमच्या मेळाव्याला खुर्च्यांची नाही तर कार्यकर्त्यांची गर्दी असल्याचंही त्यांनी म्हंटलं असून कालच्या आदित्य ठाकरेंच्या सभेला वरळीतल्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत एक प्रकार शक्तीप्रदर्शनच केलं आहे.
गद्दारांना तुम्ही तुम्ही शिवसेना का सोडली, असा प्रश्न जर विचारला तर ते ते वेगवेगळी उत्तर देत असतात. कधी हिंदुत्वासाठी तर कधी मुख्यमंत्री भेटत नव्हते असं सांगत आदित्य ठाकरे ब्लू शर्ट घालतात म्हणून आम्ही शिवसेना सोडली असल्याचे सांगतात अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.
दरम्यान, माझ्याकडून तुम्ही लिहुन घ्या हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार असून मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार नसल्याचं त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलं आहे.