नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपलं मौन सोडलं. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या योजना आणि कायद्याचं महत्त्व त्यांनी संसदेत अधोरेखित करतानाच विरोधकांवरही टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी सुधारणांच्या बाजूने असल्याचं सांगितलं आणि आता राजकारणासाठी अचानक त्यांनी यूटर्न घेतला, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत कृषी कायद्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आमचे आदरणीय शरद पवारजी यांनी कृषी सुधारणांची वकिली केली. शरद पवारांनी आताच सांगितलं मी कृषी सुधारणांच्या बाजूने आहे आणि आता अचानक त्यांनी राजकारणासाठी यूटर्न घेतला. त्यासाठीच त्यांनी त्यांचे विचार मांडले, अशी टीका मोदींनी केली. कृषी कायद्याबाबत माझं म्हणणं ऐकू नका, पण किमान मनमोहन सिंग यांचं तरी म्हणणं ऐका. मनमोहन सिंग यांनी जे सांगितलं. तेच मोदी करत आहे, याचा अभिमान तर बाळगा, असं टोलाही त्यांनी लगावला.