मुंबई : राज्यातले उद्योग तुम्ही बाहेर काढले, नानारला तुमचा विरोध, नवीन विमानतळाला विरोध करणारे तुम्ही आहेत. राज्याचा जीव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतला. महाराष्ट्र आजही गुंतवणुकीत नंबर वन आहे, अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, पत्राचाळ घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. कोविड खिचडी घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे देत असतो.
आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याचा तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. मुंबई, सातारा, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये ही वाघनखे नेणार. राज्यात जे आजपर्यंत टवाळखोर होते पण आज ते शंकेखोर झाले. ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्या शंकाखोरांचा कोथळा आम्ही बाहेर काढणार आहोत. आम्ही वाघ नखांच्या निमित्ताने राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित केले. ज्यांच्यात शंकेची कीड वळवळत आहे त्यानी या व्याख्यानाला यावे. आम्ही स्पष्टीकरण देत नाही तर सत्य मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे.