पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पांडुरंगाची ईच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोटच मिटकरी यांनी केला आहे. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले आहेत. आता मिटकरी यांच्या वक्तव्यावर आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा काय माझा निर्णय नाही, कोण कुठे जाणार आहे? हा पक्षाचा निर्णय आहे. पवार साहेबांचे राजकारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पवारसाहेब जो निर्णय घेत आहेत, तो लोकशाही मार्गाने घेत असतात. यासंदर्भात मी सगळ्यांशी चर्चा करेल, कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते मला कळेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच, आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्यावरही सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार आणि मी लहानपणापासून बहीण-भाऊ आहोत, मिटकरी यांची जी इच्छा आहे, त्याबद्दल मी आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.