टोकियो : ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिल्या पदकाची कमाई करणाऱ्या वेटलिफ्टर मिराबाई चानूला यशाचे शिखर गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. मणिपूरच्या इंफाळमधील स्पोर्ट्स अकॅडमी घऱापासून २५ किमीपेक्षा जास्त अंतरावर होती. रोज प्रवासाचा खर्च परवडणारा नसल्याने मिराबाई नदीतील रेती इंफाळला वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांकडून लिफ्ट मागत प्रवास करायची. कित्येक वर्ष ट्रकचालक मिराबाईला प्रवासासाठी मदत करत होते. यामुळेच गुरुवारी आपल्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या या ट्रकचालकांप्रती मिराबाई चानूने आदर व्यक्त करत त्यांचा सत्कार केला. मिराबाई चानूने ट्रकचालक आणि हेल्पर्सना शर्ट, मणिपूरा स्कार्फ आणि जेवण देत त्यांचे आभार मानले.
जर ट्रकचालकांनी आपल्याला प्रवासात मदत केली नसती तर वेटलिफ्टर होण्याचं आपलं स्वप्न कदाचित अपूर्ण राहिले असते असे मिराबाई सांगते. वेटलिफ्टर मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. मिराबाई चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली. कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते . त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे. भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८ वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले. भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले.
आईने विकले होते दागिने
मिराबाईची वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द घडावी, म्हणून पाच वर्षांपूर्वी तिच्या आईने आपले दागिने विकले होते. ऑलिम्पिकमध्ये रुपेरी यश मिळवताना मिराबाईच्या आईचे पाठबळ सहज लक्ष वेधत होती. आईने भेट म्हणून दिलेले ऑलिम्पिकच्या पंचवर्तुळांचे कानातले तिने या वेळी परीधान केले होते. त्यामुळे आई सैखोम ओंगबी टोंबी लेईमाला आपले अश्रू आवरणे कठीण गेलं होतं. ‘‘२०१६च्या रिओ ऑलिम्पिकआधी हे कानातले मी मिराबाईला दिले होते. तिला यश मिळावे यासाठी मी ते सोन्याचे बनवले होते. तिने मिळवलेले पदक पाहताना मी आणि माझे पती आनंदाश्रूंत न्हाऊन गेलो. मेहनतीचे चीज झाले,’’ अशी प्रतिक्रिया तिच्या आईने व्यक्त केली होती.