येस न्युज मराठी नेटवर्क : बीसीसीआयने देशांतर्गत सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी करंडक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. शाह यांनी पत्राच्या माध्यमातून देशातील विविध राज्यातील संघटनांना याबाबतची कल्पना दिली आहे. ही स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयामुळे गेल्या 87 वर्षांपासूनची परंपरा खंडित झाली आहे. तसेच या निर्णयाचा अनेक खेळाडूंना आर्थिक फटका बसू नये म्हणून बीसीसीआयने नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेतला आहे. रणजीच्या पहिल्या मोसमाचं आयोजन 1934 मध्ये करण्यात आलं होतं. बीसीसीआय यंदा रणजी ट्रॉफी ऐवजी विजय हजारे ट्राफी आणि सीनियर महिला वनडे स्पर्धेचं आयोजन करण्याच निर्णय घेतला आहे.
रणजीच्या सामन्यातून देशांतर्गत सामने खेळणाऱ्या खेळाडूंना एका सामन्याते जवळपास 1 लाख 80 हजार मिळतात. मात्र ही स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे खेळाडूंना आर्थिक फटका बसू नये म्हणून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं जय शाह म्हणाले.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विजय हजारे करंडकाचे आयोजन 6 शहरांमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान त्या 6 शहरांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ही स्पर्धा एकूण महिनाभर चालणार आहे. यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व संघ हे फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात बायो बबल वातावरणात प्रवेश करतील. या स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.