सोलापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून. साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून सकाळी 9.00 वाजता पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर गणेश निऱ्हाळी , मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते समता दिंडीस हिरवा झेंडा दाखवून समता दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. समता दिंडीमध्ये मुकुंदनगर गायन पार्टी या कलापथकाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनपटावर आधारित पोवाडे व विविध गीते सादर करण्यात आली.
या वेळी , “सामाजिक समता प्रस्थपित करण्याकरीता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मोठे योगदान दिले असून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता हे भारतीय संविधानाचा गाभा असून ते प्रत्येक नागरिकाने आत्मसात करण्याचे आवाहन केले. राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी समाजात समता व सामाजिक न्यायाचे मुळ रुजवले असून त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून आर्थिक व सामाजिक उन्नतीचे कार्य केल्याचे सांगितले. छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करुन जिल्ह्यातील सर्व जनतेस सामाजिक न्याय दिनानिमित्त लोक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही विभागाची बांधिलकी असून विभाग यासाठी नेहमीच अग्रेसर आहे ,असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, श्रीमती सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर रविंद्र कदम पाटील यांनी दिंडीच्या समारोपा प्रसंगी शुभेच्छा देताना राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यात समता दिंडीच्या माध्यमातून समतेचे विचार व लोक जागृती करण्याचे महत्वपुर्ण कार्य अभिवादन कार्यक्रमाव्दारे होत असल्याचे सांगितले.”
या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व कर्मचारी, शासकीय वसतिगृहाचे गृहपाल व विद्यार्थी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे कर्मचारी व जिल्हयातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, अनुदानित वसतिगृहाचे कर्मचारी, विविध महामंडळाचे कर्मचारी, समतादूत व तालुका समन्वयक उपस्थित होते.
अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली.
