गुणवंत विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस
सोलापूर – इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी भांगरे गुणगौरव योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दहावी-बारावीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे.
संबंधित विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल चालविल्या जातात. यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. या दोन्ही मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीसह बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी ५ गुणवंत मुला-मुलींचा पारितोषिक दिले जाणार आहे.
गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्यासह गुण मिळवून राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्पात प्रथम येणान्या ५ मुला-मुलींना गौरविण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाचे विभागीय मंडळ नसल्याने ते वगळून राज्य शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळातील प्रत्येकी २४ गुणवंतांना दहा महिन्यांसाठी प्रतिमाह एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. अपर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या ३ मुला-मुलींना सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांचा सत्कार केला जाणार आहे.
गुणवत्तेनुसार प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला राज्य स्तरावर ३० हजार, अपर आयुक्त स्तरावर १५ हजार आणि प्रकल्प कार्यालयात १० हजार रुपये मिळतील. द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ हजार, १० हजार व ७ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी २० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये दिले जातील. चौथा क्रमांक मिळवणाऱ्याला १५ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १० हजार रुपये मिळणार आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,सोलापूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होटगी, ता. दक्षिण सोलापूर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सवतगव्हाण, ता. माळशिरस व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरुडा, ता. जि. धाराशिव या तीन शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत.तरी सोलापूर व धाराशिव जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या पालकांनी सदर आश्रमशाळेत प्रवेश घेऊन सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर. भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय, संगमेश्वर महाविद्यालयाच्या समोर, सात रस्ता, सोलापूर.या कार्यालयास संपर्क साधावा.
असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प् सोलापूर सागर नन्नवरे यांनी केले आहे.