डॉ. रवींद्र चिंचोलकर लिखित ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाचे प्रकाशन
सोलापूर : जनसंपर्क हा सर्वंकष विकासाचा विषय आहे. मानवी संसाधन कौशल्यपूर्ण रीतीने वापरण्यासाठी जनसंपर्क घडून येणे खूप महत्त्वाचे असते. अधिकाधिक लोकसंवाद घडून येण्यासाठी जनसंपर्क महत्त्वाचा आहे. डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी लिहिलेले हे पुस्तक सर्व भाषांत भाषांतरित व्हावे, अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर लिखित ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटर सभागृहात हा कार्यक्रम झाला. सोलापूर श्रमिक पत्रकार संघ तसेच सुसंवाद माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा तसेच बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा.डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा, परिक्षा नियंत्रक प्रा. डॉ. शिवकुमार गणापुर, डॉ. सुरेश पुरी (परीक्षा मंत्री, हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद), विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी या ग्रंथावर भाष्य केले. यावेळी प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डॉ. शिवाजी जाधव, सुसंवाद माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजित बिराजदार उपस्थित होते.
पुस्तकावर भाष्य करताना डॉ. आलोक जत्राटकर म्हणाले की, जनसंपर्क हा विषय प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन करण्याचा विषय आहे. डॉ. चिंचोलकर यांनी त्यांच्या अनुभवाचा कस लावत हे पुस्तक साकारले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप अर्थ व्यक्त करणारे आहे. जनसंपर्क हा मानवकेंद्री विषय आहे. जनसंपर्काच्या अंतर्गत आणि बाह्य जगाशी सांधा जोडण्याचे काम हे पुस्तक करेल. या ग्रंथात पूरक छायाचित्रे, रेखाचित्रे वापरली आहेत. त्यामुळे हा ग्रंथ वाचनिय झाला आहे. नऊ प्रकरणात हे पुस्तक विभागले आहे. कार्पोरेट जनसंपर्क यावरही यामध्ये चांगले लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, दादासाहेब फाळके यांच्यावर त्यांनी उत्तम जनसंपर्क असणारे महापुरुष म्हणून मांडणी केली आहे.
मनोगते
जनसंपर्क हा खूप महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. हे पुस्तक सर्वांना उपयुक्त होईल. – प्र- कुलगुरू प्रा.डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा
उद्योगात जनसंपर्क असणे गरजेचे असते. मी स्वतः ते अनुभवतो. जनसंपर्क हा विषय कोणताही उद्योग पुढे नेण्यासाठी महत्वाचा असतो. – राम रेड्डी (बालाजी उद्योग समूहाचे अध्यक्ष)
जनसंपर्क माध्यमे ही आपल्यासाठी खूप सवयीची झाली आहेत. लोकांचे दैनंदिन जीवन या माध्यमांशी जोडलेले आहे. जनसंपर्क अधिकारी हा उद्योगाच्या प्रतिमा निर्मितीत महत्वाची भूमिका निभावत असतो.
डॉ. सुहासिनी शहा (अध्यक्षा – प्रिसिजन फाऊंडेशन)
परस्पर संवाद असेल तर विकास होत असतो. हा परस्पर संवाद घडवून आणण्याचे काम जनसंपर्क अधिकारी करत असतो. डॉ. चिंचोलकर यांनी आपल्या भाषणात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करीत असताना आलेल्या अनुभवाचा दाखला देत जनसंपर्क अधिकारी किती महत्त्वाचा असतो हे सांगितले. – डॉ. रवींद्र चिंचोलकर (पुस्तकाचे लेखक)
या ग्रंथाचे लेखक डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी अनेक वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या विषयाला न्याय मिळाला आहे. जनसंपर्क आणि अध्यापन याचा समन्वय त्यांनी साधला आहे. जनसंपर्काचे बाह्यरंगही पुढे आणावेत. – प्रा. डॉ. गौतम कांबळे (संचालक-सामाजिक शास्त्रे संकुल)
विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे ही शिक्षकाची मानसिकता असावी. १९८४ पर्यंत जनसंपर्क या विषयावर फारसे लेखन झाले नव्हते. त्यावेळी मी “जनसंपर्क संकल्पना आणि सिद्धांत” हे पुस्तक लिहिले. डॉ. चिंचोलकर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे वैचारिक बैठक आहे.- डॉ. सुरेश पुरी
जनसंपर्क कौशल्य असलेला व्यक्ती पुढे जातो. व्यवसायात जनसंपर्क खूप महत्त्वाचा आहे. विद्यापीठातर्फे डॉ. चिंचोलकर यांना शुभेच्छा. – परिक्षा नियंत्रक प्रा. डॉ. शिवकुमार गणापूर
जनसंपर्काच्या संदर्भात मराठीत खूप कमी ग्रंथ उपलब्ध आहेत. ही उणीव लक्षात घेऊन जनसंपर्काचे अंतरंग या ग्रंथाचे प्रकाशन आम्ही केले. या ग्रंथांमध्ये जनसंपर्क तसेच कार्पोरेट जनसंपर्क याच्याशी निगडित सर्व पैलूंची तपशीलांसह माहिती आहे. हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. – प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे
प्रकाशन समारंभास जनसंपर्क तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. समीर इनामदार यांनी केले. आभार सिद्धाराम पाटील यांनी मानले.