मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून मोठं विधान केलं आहे. या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.नारायण राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड आंदोलन केले होते . त्यामुळे या परिसरात वातावरण तंग झाले होते .
संध्याकाळी युवा सेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. नितेश राणे यांनी हा फोटो ट्विट करत त्यावर भाष्य करताना हे मोठे विधान केले आहे. याचा अर्थ पश्चिम बंगालप्रमाणे ही राज्य पुरस्कृत हिंसा होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे. पण ते तर गुंडांचा सत्कार करताना दिसत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. त्यामुळे या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
ठाकरेंकडून कौतुक
दरम्यान, काल रात्री वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केले .