येस न्युज मराठी नेटवर्क । करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशभरामधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भातील दखल न्यायालयांनाही घेतल्याचं चित्र दिसत आहे. राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या मुद्द्यावरुन गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. दिल्ली सरकारने या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारवर पुरवठ्यात अडथळा आणण्याचे आरोप केले.
केंद्र सरकार ऑक्सिजनचा पुरवठ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे, असं दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितलं. केंद्र सरकार फक्त आदेश देत असल्याचंही दिल्ली सरकारने म्हटलं आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत असं उत्तर केंद्र सरकारने दिलं. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला, ‘रोज लोक मरतायत, तुम्ही काहीही करा आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भातील पावलं उचला,’ असं सांगितलं आहे.
उच्च न्यायालयामध्ये दिल्ली सरकारने केंद्र सरकार ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण करत असल्याचं म्हटलं. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच केंद्र सरकार केवळ आदेश जारी करत आहे. केंद्र सरकार आपल्या कामात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. केंद्राची जबाबदारी काय आहे यासंदर्भात न्यायालयाने त्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत अशी विनंतीही दिल्ली सरकारने न्यायालयाला केली. न्या. विपिन सांघी आणि न्या. रेखा पाली यांच्या द्वीसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.