येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेत परमबीर सिंह यांनी आपली बदली चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्दतीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे. किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपली बदली झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
याचिकेत परमबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी प्रकरणात तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा याची आपण खात्री केली होती. याशिवाय एनआयएकडून होणाऱ्या तपासात कोणताही अडथळा आणला नव्हता. आकसापोटी आपली बदली करण्यात आली असून केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.
बदली आणि पोस्टिंगसाठी करण्यात येणाऱ्या गैरव्यवहारासंबंधी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालासंबंधीही सीबीआय चौकशी करण्याची परमबीर सिंह यांची मागणी आहे. तसंच आपले आरोप सिद्ध करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या मुंबईमधील निवासस्थानावरील सीसीटीव्ही ताब्यात घेतले जावेत अशी विनंती त्यांनी केली आहे.