येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालेलं आहे. सहाव्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष घरी भेट घेत, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा देखील केली होती, मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही. त्यामुळे आता राज्यात राज्यसभेची निवडणूक अटळ आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “वेळ संपलेली आहे असं म्हणण्यापेक्षा आता वेळ सुरु झालेली आहे. आता स्पष्ट चित्र झालं आहे. महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले की, महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणूक आपण एकमेकांच्या सहमतीने लढवतो. कोणत्याही प्रकारे घोडेबाजाराला वाव राहू नये, यासाठी नेहमीच आम्ही अशा निवडणुकांमध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या दृष्टीने महाविकास आघाडीचे नेते हे आज सकाळी भाजपाच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले आणि चर्चा केली. काही प्रस्तावांचं अदानप्रदान झालं. मला असं वाटतं की, पुढील तीन-चार तासांमध्ये त्या संदर्भात काही विशेष घडलं नाही. दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम आहेत.”