अमरावती : समाजात स्थान असलेल्या लोकांना आपल्याला पक्षात स्थान द्यायचे आहे. हा धोरणात्मक बदल आपण करायला हवा. हे जर झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक सक्षम पक्ष म्हणून पुढे येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा आजचा आठवा दिवस असून संवाद दौरा यात्रा आज अमरावती येथे पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्व निघालो आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेण्यासाठी, महाविकास आघाडीतील पक्षांशी ताळमेळ घालून देण्यासाठी ही संवाद यात्रा आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पवारसाहेबांच्या विचारांनी असंख्य तरुण आज प्रभावित झालेले आहेत. त्यांना राष्ट्रवादी विषयी आकर्षण निर्माण झाले आहे. या सर्व तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या छताखाली आणत राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी आपण काम करायला पाहिजे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.