येस न्युज नेटवर्क : आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला. माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. आरेत कारशेड उभारु नका असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते असेही ठाकरे म्हणाले.
अमित शाह आणि माझं जे ठरलं होत ते झालं असते तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. सगळं सन्मानानं झाले असते. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जे भाजपसोबत आज गेले, त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा असेही ते म्हणाले. तसेच लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार हवा. लोकशाहीचा घात करु नका, मतदारांच्या मतांचा आदर करा असेही ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, कांजूर मार्गाचा निर्णय कायम राहू द्या. मुंबईकरांच्या वतीनं मी विनंती करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका असेही उद्धव ठाकरे म्हणाले.