कोलकाता : “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानासाठी कोलकाताला आले, या गोष्टीचा मला आनंद होत आहे. मात्र, तरीही माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळालेला नाही”, अशी खदखद सुभाजचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी व्यक्त केली. त्यांनी ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतच भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सुभाजचंद्र बोस यांच्या सन्मानासाठी जी स्पर्धा रंगली आहे ही चांगली गोष्ट असल्याचं अनिता बोस म्हणाल्या.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांच्याकडूनही नेताजी सुभाजचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने लाँगमार्च काढण्यात आला होता. या निमित्ताने सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस आनंदी आहेत. मात्र, तरीदेखील सुभाषचंद्र बोस यांना हवा तसा सन्मान मिळाला नाही, अशी खदखद अनिता बोस यांनी व्यक्त केली.