अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा आज निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यपद रद्द करा, अशी मागणी याचिकाकर्ते तिरमारे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता बच्चू कडू उच्च न्यायालयात जाण्यार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.