मुंबई : म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्य़ात आली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडा यांनी मध्यरात्री ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत आव्हाडांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर भाजपने आव्हाड आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी पेपरफुटीतील टोळीला पकडलं. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींच्या संवादात म्हडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता. म्हडाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडाच्या भरतीच्या परीक्षेतेचा पेपर कुठेही फुटला नाही, त्याआधीच कारवाई करण्यात आली. म्हाडाच्या पेपरसंदर्भात फक्त एकाच व्यक्तीला माहिती होती, तरीही पेपर कसा फुटला? म्हाडाच्या परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झालाय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आव्हाड म्हणाले.