सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा दिनानिमित्त ज्येष्ठ लेखकांचा सन्मान; छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्काराचेही वितरण
सोलापूर- लेखक, साहित्यिकांच्या दर्जेदार लेखनानेच मराठी ही दिवसेंदिवस समृद्ध होत चालली आहे. त्यामुळे आता नव्या लेखकांनी दर्जेदार लेखन करत राहिले पाहिजे, त्यातून वाचकवर्गाशी संवाद दृढ होतो आणि लेखकाला सन्मानही लाभतो, असे मत ज्येष्ठ लेखक सिताराम सावंत यांनी व्यक्त केले.


मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात ज्येष्ठ लेखकाचा सन्मान म्हणून सिताराम सावंत यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. नानासाहेब गव्हाणे यांनी करून दिला.
यावेळी विद्यापीठाच्यावतीने छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शिक्षक गटातून गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथील डॉ. किसन माने यांना आणि कर्मचारी गटातून विद्यापीठातील सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सामंत म्हणाले की, लेखकांनी दर्जेदार लेखन करण्याची जाणीव ठेवली पाहिजे. दर्जेदार लेखनातूनच साहित्याचे मूल्य वाढते. गुणवत्तापूर्ण लेखन वाचकांच्या मनात स्थान निर्माण करते आणि लेखकाच्या प्रतिष्ठेलाही अधोरेखित करते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. दामा यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठीचा दर्जा, उंची व सन्मान वाढल्याचे सांगितले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिरात हजारो वर्षांपूर्वीचा मराठी शिलालेख असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याची महती महान असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कवी संमेलन
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत विद्यापीठात कवी संमेलन आयोजित करण्यात आले. यामध्ये कवी इंद्रजीत घुले, बदीउज्जमा बिराजदार, तालीब सोलापुरी, गणेश गायकवाड, रोहित देशमुख, रामप्रभू माने, सागर अचलकर, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. ममता बोल्ली आदींनी सहभाग घेतला. आई, बाप, प्रेम, आधी विविध विषयांवरील यावेळी कवितांचे सादरीकरण झाले त्यानंतर भावनांचा मल्हार : पावसाच्या कवितांचा अभिवाचन कार्यक्रमही पार पडला. यात डॉ. ममता बोल्ली आणि जैद शेख यांचे सादरीकरण झाले.

