महाराष्ट्राचे लाडके दादा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामती मध्ये लाखोंच्या जनसमुदायाने अश्रूंच्या धारा गाळत जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला. दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी शासकीय बिगुल वाजवून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अजितदादांचे सुपुत्र पार्थ आणि जय यांनी भडाग्नी दिला. यावेळी हवेत तीन वेळा फायरिंग करून अजित दादांना अखेरची सलामी देण्यात आली. काल बारामती येथील विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी नऊ वाजता अंतयात्रेला प्रारंभ झाला. त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे पार्थिव देह आल्यानंतर गावकऱ्यांना अश्रूचा बांध आवरता आला नाही. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार विधी पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, राज ठाकरे, रितेश देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार हे अंत्यविधीला उपस्थित होते. एकूणच गेल्या 30 तासापासून बारामती मध्ये लाखोंच्या जनसमुदायाने उपस्थित राहून अचानक एक्झिट केलेल्या अजित दादांना अखेरचा निरोप दिला. आता महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा पर्व संपले असून ते फक्त आठवणीतच राहिले आहेत. सडेतोड.. हजर..जबाबी ..डॅशिंग.. आणि खमके नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अजितदादांना येस न्यूज मराठीची भावपूर्ण आदरांजली..

