मुंबई : एकीकडे निकाल आज जाहीर होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
जुलैअखेर इयत्ता 12 वी निकाल लागेल असे म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले, यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. मात्र, बारावीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी 21 जुलैला शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली होती.महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.