मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे. यापूर्वी लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम असतील असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच काही नव्या नियमांचाही समावेश करण्यात आला आहे.
राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला असून परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात प्रवेश करण्याआधी 48 तासांपूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या काही राज्यांची यादी जाहीर केली होती. त्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांनाही RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच राज्यात प्रवेश मिळणार आहे.