येस न्युज मराठी नेटवर्क । भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची भारताला कमतरता जाणवत असून अमेरिका, रशियासह अनेक देशांकडून मदत केली जात आहे. दरम्यान देशात रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणंही कठीण झालं असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितलं आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
अमेरिका सरकाने आपल्या नागरिकांनी करोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितलं आहे. अमेरिकेकडून यासंबंधी अॅडव्हायजरी प्रसिद्ध करण्यात आलेली असून नागरिकांनी भारतात जाऊ नका किंवा लवकरात लवकर भारत सोडा असं सांगण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या १४ विमानं सुरु आहेत. याशिवाय युरोपमधून जोडली जाणारी सेवा आहे.