सोलापूर : मराठा समाजाचे आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार काहीही करत नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला . मराठा आरक्षण रद्द झाल्याबाबत राज्य सरकार विनाकारण केंद्राकडे बोट दाखवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भाषा करीत आहेत. मात्र त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडावे आणि मगच आंदोलन करावे, असेही गोरे यांनी सांगितले. राज्य शासनाला ओबीसींसाठी समर्पित आयोग नेमून ईम्पिरिकल डाटा तयार करण्याचे व ओबीसींना आरक्षण देण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. परंतु त्याबाबत राज्य शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही गोरे यांनी दिला आहे. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पाटील , महापौर कांचना यन्नम , शहराध्यक्ष देशमुख आदी उपस्थित होते.