टोकियो: ऑलिम्पिक २०२० मधील सहावा दिवस भारतासाठी आतापर्यंतचा सर्वोत्तम असा ठरला आहे. आज २९ जुलै रोजी भारताने पदक मिळवण्यासाठीची पायाभरणी केली. भारताच्या हॉकी संघासह तिघांनी खेळाडूंनी वैयक्तीक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.दिवसाच्या सुरुवातीला बॅडमिंटन महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला आणि उपांत्यपूर्वी फेरीत प्रवेश केला.
त्यानंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाचा ३-१ पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.या दोन आनंदाच्या बातमीनंतर तिसरी बातमी तिरंदाजीमधून आली. अतानू दासने प्रथम चायनीज तैपईच्या डेंग यू चेंगचा ६-४ असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर दासने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जिन हायकचा शूट आउटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.दासनंतर बॉक्सिंगमध्ये पुरुषांच्या ९१ किलो वजनी गटात भारताच्या सतीशकुमारने जमैकाच्या रिकोर्डो ब्राउनचा ४-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.वैयक्तीक प्रकारात आता भारताचे तीन खेळाडू पदकापासून फक्त एक विजय दूर आहेत. सिंधू, दास आणि सतीशकुमार यांना पदक जिंकण्यासाठी एक विजय हवाय. तर हॉकी संघाला पदक जिंकण्यासाठी किमान तीन विजय मिळवावे लागतील.या शिवाय नेमबाजी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल पात्रता फेरीत प्रेसिशनमध्ये भारताच्या मनू भाकरने ९७,९७ आणि ९८ असे २९२ गुण मिळवत पाचवे स्थान तर राही सरनोबतने २८७ गुणासह १८वे स्थान मिळवले. आता उद्या रॅपिड फेरीतील गुणांसह अव्वल ८ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र होतील.
पदकतालिकेत सध्या अमेरिका ११ सुवर्ण, १२ रौप्य आणि १० कास्य पदकासह पहिल्या, चीन १३ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. तर यजमान जपान १३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एका रौप्य पदकासह ४५व्या स्थानावर आहे.