मुंबई: संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत, भाजप आणि ईडीवर टीकेचा बाण सोडला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडचे सरकार पाडण्याचा डाव असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला. तसेच भाजप नेत्यांनी राज्यातील सरकार पाडण्यासाठी दबाव टाकला आणि तपास यंत्रणाच्या धमक्याही दिल्या, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, असा इशारा देत संजय राऊत यांनी तपास यंत्रणा आणि भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच उद्यापासून तुम्हाला अनेक गोष्टी समजतील, असेही सांगितले.
या पत्रकार परिषदेला महापौर किशोरी पेडणेकर, आनंद आढसूळ, अरविंद सावंत,विनायक राऊत,अनिल देसाई,दादा भुसे ,दिवाकर रावते , उदय सामंत , प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे,सचिन अहिर,आदेश बांदेकर, मनीषा कायदे,गजानन कीर्तिकर , संजय शिरसाठ यांच्यासह अनेक शिवसेना खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित होते. त्याशिवाय शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मुंबईसह पुणे, नाशिक, सोलापूर आणि इतर मोठ्या शहरातील शिवसेना कार्यलयाबाहेर शिवसैनिक जमले आहेत. पुणे आणि सोलापूरमध्ये पोस्टरबाजीही पाहायला मिळाली.
महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न –
‘आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली. मन साफ असेल तर कुणालाच्या बापाला घाबरु नको, असे बाळासाहेब सांगायचे. ‘ खासदार संजय राऊत म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली.”
महाराष्ट्र हा गांची औलाद नाही – शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. म्हणून हे सरकार पाडण्यासाठी भाजपने पवार कुटुंबियांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लावला. मन साफ आहे तर कुणाच्या बापाला घाबरु नका असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता. असं खासदार संजय राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा गांची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.